मढी (प्रतिनिधी) – राज्यभरातील शेतरस्त्यांच्या प्रश्नावर उभारलेल्या ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळी’चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मढी येथे आयोजित करण्यात आले असून, “चलो मढी” असा जोशपूर्ण नारा देत शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतरस्त्यांच्या मूलभूत समस्यांवर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याचे चित्र आहे. “माझा रस्ता होवो न होवो, पण शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळाल्याशिवाय थांबणार नाही,” हा महासंकल्प आता प्रत्यक्षात उतरत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या अडचणींवर मात करत, निस्वार्थ भावनेतून या चळवळीत सहभाग घेतला आहे. या एकजुटीच्या जोरावर चळवळीने न्यायालयीन लढ्यात यश मिळवले असून, राज्य शासनाकडूनही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे हा विजय प्रत्येक शेतकऱ्याच्या संघर्षाचे फलित मानला जात आहे.
अधिवेशनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात गरजवंत शेतकऱ्यांना प्राधान्याने न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ अधिक सक्षमपणे कार्यरत राहणार आहे. तसेच या लढ्यात साथ देणाऱ्या माध्यमांचेही त्यांनी आभार मानले.
या अधिवेशनामुळे शेतरस्त्यांच्या प्रश्नावर राज्यभरात नवी चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








