भोर | प्रतिनिधी:
भोर तालुक्यातील कोर्ले गावातील जांभूळवाडी परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या कामासाठी सुमारे ७० लाख ७६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जांभूळवाडी हे ठिकाण रायरेश्वर किल्ल्याच्या उंच डोंगरकड्याच्या पायथ्याशी वसलेले असून, पावसाळ्यात येथे अतिवृष्टीसोबतच वेगवान वाऱ्यांचा सामना करावा लागतो. या काळात दरडी कोसळणे, झाडे पडणे तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीमुळे परिसरातील नागरिक, त्यांची घरे आणि मुख्य रस्ता यांचे सुरक्षिततेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहेत. या कामाचे भूमिपूजन मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विकासकामांबाबत माहिती दिली.
ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले असून, संरक्षण भिंतीमुळे भविष्यातील संभाव्य धोके टळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.









