विरार (प्रतिनिधी) :
वसई-विरार शहर व परिसरातील मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या पार्श्वभूमीवर मॅपिंग प्रक्रिया वेगाने सुरू असून, नागरिकांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन वसई-विरारचे महापौर Ajiv Patil यांनी केले आहे.
मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाआधी बीएलओमार्फत मतदारांचे मॅपिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराने सर्वप्रथम आपले नाव २००२ च्या मतदार यादीत आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांचे नाव त्या यादीत नसेल, त्यांनी आपल्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाच्याही २००२ मधील नोंदीची सविस्तर माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
सदर माहितीमध्ये संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक यांचा समावेश असणे आवश्यक आहे. विवाहित महिलांनी या प्रक्रियेदरम्यान सासरच्या व्यक्तींची नव्हे, तर माहेरच्या आई-वडिलांची माहिती देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महापौर अजीव पाटील यांनी स्पष्ट केले की, जे नागरिक मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांची नावे आगामी मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता आपल्या परिसरातील बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे योगदान महत्त्वाचे असल्याने, सर्वांनी जागरूक राहून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








