श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी :
चैत्र महिन्यानिमित्त श्री रेणुका माता मंदिर परिसरात विश्वशांती व जगाच्या कल्याणासाठी भव्य अयुतचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा माहूरगड येथील मातृतीर्थ रोडवरील बालाजी मंगल कार्यालयात अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरू आहे.
श्रीसदगुरु सखाराम महाराज, शंकराचार्य संकेश्वर पीठाधीश्वर यांच्या कृपाशीर्वादाने दि. ४ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत महायाग पार पडत आहे. या महायागात नवकुंडात्मक अयुतचंडी यागाद्वारे दररोज एक हजार चंडीपाठ असे एकूण दहा हजार पाठांचे पठण केले जात आहे.
२५१ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत दशसहस्त्र पाठांतरानंतर सहस्त्र पाठांचे पठण आणि २१ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हवन सोहळा पार पडत असून, महाआरतीने कार्यक्रमाची सांगता केली जाते.
या महायागामध्ये सहस्रार्चन, कुंकू मार्जन, पुष्प, फल व द्रव्य अर्चन, हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मणभोजन तसेच नामसंकीर्तन व गायन-वादन सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदांचे पारायणही विविध राज्यांतून आलेल्या वेदपाठी ब्राह्मणांच्या उपस्थितीत सुरू आहे.
महायागाच्या यशस्वी आयोजनासाठी टिटवाळा (मुंबई) येथील शाम जोशी नियोजन पाहत असून, ब्रह्मवृंद व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीरामपूर येथील हरीश पैठणे गुरुजी पार पाडत आहेत. ग्रामाचार्य म्हणून रवींद्र कान्नव गुरुजी यांचेही सहकार्य लाभत आहे.
विशेष म्हणजे, या महायागादरम्यान श्री रेणुका माता मंदिर पायथ्याशी दररोज १००० सुवासिनींना साडी-चोळी व ओटी देऊन सन्मानित केले जात आहे. त्यामुळे या सोहळ्याला धार्मिकतेसोबतच सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
विश्वशांती आणि भगवती रेणुका मातेंची कृपा लाभावी या उद्देशाने आयोजित या महायागाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.











