छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
वाघाळे गावातील भारम ते वाघाळे रोडलगत असलेल्या श्री गणेश मंदिरात मंगळवार रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील बाहेरील व आतील दोन्ही घंटा चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
घंटा चोरीची बातमी गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मंदिराकडे धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून धार्मिक स्थळांची सुरक्षितताही धोक्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघाळे व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता मंदिरातील घंटाच चोरीला गेल्याने “दैवतही सुरक्षित राहिले नाही” अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींचा शोध घ्यावा, त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून योग्य शिक्षा करावी, अशी मागणी वाघाळे गावातील नागरिक व परिसरातील भाविकांकडून करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करावी, अशीही मागणी होत आहे.
