कडेगाव (प्रतिनिधी) : कडेगाव तालुक्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेल्या भागांना शाश्वतपणे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाचे पलूस-कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी ओगलेवाडी येथे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीत तालुक्यातील अनेक गावांतील वस्ती, मळे व शेती क्षेत्र अद्याप टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या सर्व भागांचा तातडीने सर्वे करून शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल व त्यास लवकर मंजुरी देऊन पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन राजन डवरी यांनी दिले.
कडेपूर, उपाळे वांगी, वांगरेठरे, शाळगाव, रायगाव, आमरापूर, हणमंतवडिये, येडे, तोंडोली, सासपडे, तडसर, हिंगणगाव, अपशिंगे, कोतवडे, शिवाजीनगर, नेर्ली, वडियेरायबाग, नेवरी, येतगाव, खराडे वांगी, कान्हरवाडी आदी गावांतील वंचित भागांना कालवे, बंदिस्त पाईपलाईन, तलाव दुरुस्ती व नवीन सुविधा निर्माण करून पाणी पोहोचवण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल. टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








