रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्याला अलीकडील वादळी पावसाचा मोठा तडाखा बसून शेकडो हेक्टरवरील केळी बागांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा तातडीने पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आली असून यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोठ्या प्रमाणावर मोडून पडल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता.
उटखेडा, कुसुंबा, भाटखेडा, निंभोरा, गहुखेडा, रणगाव, तासखेडा तसेच कोचूर, अटवडा, नेहेता, दोधे या गावांतील शेती शिवारात केळी व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन तहसीलदार दिपाली जेधे यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे, उपाध्यक्ष शाम भामरे, शेतकरी आघाडीचे सुरेश शिंदे, शहर उपप्रमुख संतोष महाजन, युवासेना शहर प्रमुख निलेश महाजन, शेख शाहरुख, शेख फारुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.









