आजरा (प्रतिनिधी) : आजरा शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनल्याने नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले आहे. कचरा उठाव रखडल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला जोरदार धारेवर धरत जाब विचारला. “शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना प्रशासन झोपले आहे का?” अशा तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान स्वच्छता अधिकारी अमर कांबळे यांना बोलावून नगरसेवकांनी कचरा उठावाच्या टेंडरमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत सवाल उपस्थित केले. शहरभर कचरा साचलेला असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी निरुत्तर केले.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत नगरसेवकांनी दोन दिवसांत कचरा प्रश्न मार्गी लावण्याचा अल्टिमेटम दिला. १२ एप्रिलपर्यंत स्वच्छता न झाल्यास १३ एप्रिल रोजी कचऱ्याने भरलेले ट्रॅक्टर नगरपंचायतीसमोर उभे करून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीस नगरसेवक अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, अशीफ पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी तसेच नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर) यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर जोरदार टीका केली. यावेळी विक्रम पटेकर, नौशाद बुडडेखान, किरण कांबळे यांच्यासह शासकीय अधिकारी निहाल मनेर उपस्थित होते.
“प्रशासनाने कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला लोकशाही मार्गाने धडा शिकवू,” असा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला असून १३ एप्रिलच्या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








