पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण
पानी फाउंडेशन तर्फे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी युसुफ मेहेरअली सेंटर बांधणवाडी येथे फार्मर कप २०२६ चे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या ३ दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन पानी फाउंडेशन, कृषी विभाग पेण, उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी प्रगतशील शेतकरी सदाशिव म्हात्रे, रोमेश पाटील ॲड.डी के पाटील, प्रदीप म्हात्रे, पत्रकार कैलासराजे घरत, रोहिणी ठाकूर, अभिमन्यू म्हात्रे यांच्यासह ६६ प्रशिक्षणार्थीं शेतकरी व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या शेती विषयी मार्गदर्शन शिबिरात सहभागी झाले होते. प्रशिक्षक टीम आशिष लाड सर, अभिजीत पवार सर, अनिकेत जगदाळे, अंकिता कोठे, कल्याणी माळी, बालकृष्ण रणसिंग, विजय नाचरे यांनी शेतीविषयी अनमोल असे मार्गदर्शन आपल्या अनोख्या शैलीत केले. या ३ दिवसांच्या प्रशिक्षणातून गटशेतीतून उत्पन्न वाढीबाबत आवश्यक माहिती मिळाली.भर उन्हातच शेत नांगरणी करावी, भाताचे वाण घेऊन “बीज उगवण प्रक्रिया” तसेच “रासायनिक बीज प्रक्रिया” व “जैविक बीज प्रक्रिया” करताना कोणती काळजी घ्यावी.
यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकडून करून घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याकडून होणाऱ्या चुका लक्षात आल्या. रासायनिक कीड नाशकांच्या अतिवापरामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम पाहता त्याऐवजी जैविक निमार्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करावा. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. या शिबिरा दरम्यान पेण तालुक्यातील
संदेश शेडगे सर-कृषी सहाय्यक, अमित गावडे सर-कृषी अधिकारी पेण, दिगंबर साळे-मंडळ कृषी अधिकारी कामार्ली, नितेश म्हात्रे बचत गट पेण पंचायत समिती, अमोल म्हात्रे – सामाजिक न्याय विभाग अलिबाग प्रकल्प अधिकारी आदी मान्यवरांनी या कृषी शिबिरास भेट देऊन शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून कृषी विभाग सदैव आपल्या सोबत असून जे जे सहकार्य आपल्याला लागेल ते नक्कीच देण्याचा
आम्ही प्रयत्न करू असा विश्वास देण्यात आला. उपस्थित कृषी अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते शिबिरातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारची शिबिरे आपल्या भागात राबविली पाहिजे जेणेकरून शेतकरी आणि युवा वर्ग पुन्हा एकदा शेतीकडे वळेल आणि गटशेतीच्या माध्यमातून आपली शेती स्मार्ट शेती करून सुजलाम सुफलाम होईल. गट शेतीच्या माध्यमातून स्मार्ट शेती करताना निविष्ठा खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आणि उत्पन्नात वाढ होऊन उत्पन्न वाढून शेतकरी समृद्धीच्या शिडीवर कसा पोहचेल याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. हसत खेळत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे तीन दिवसीय शिबिर यशस्वी रित्या पार पडले. एकच शेती गट शेती..! चला करूया स्मार्ट शेती..!फार्मर कप पेण मध्येच येणार..!अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी यावेळी आपला आत्मिश्वास व्यक्त केला.











