कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ‘ड्रीम प्रोजेक्ट’ समजल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा अखेर समोर आला आहे. या नवीन आराखड्यानुसार महामार्गाच्या मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असले, तरी अद्याप नुकसान भरपाईची रक्कम जाहीर न झाल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा आणि चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, सुधारित आराखड्यालाही ‘शक्तीपीठ विरोधी कृती समिती’ने आपला विरोध कायम ठेवला आहे.
व्याघ्र प्रकल्पावरून जाणार मार्ग; पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर
सुधारित आराखड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा महामार्ग आता व्याघ्र प्रकल्पाच्या जवळून जाणार आहे. यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पर्यावरणप्रेमींनी या बदलावर नाराजी व्यक्त केली आहे.
विरोध करणाऱ्या गावांना दिलासा, पण नवा संघर्ष सुरू
पूर्वीच्या आराखड्याला ज्या गावांनी तीव्र विरोध दर्शवला होता, त्यातील बहुतांश गावे सुधारित आराखड्यातून वगळण्यात आली आहेत. मात्र, तरीही अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सावध भूमिका घेतली आहे. कृती समितीचा विरोध पाहता, महामंडळाने अजूनही हा आराखडा अधिकृतपणे सार्वजनिक केलेला नाही.
प्रवासाचा शेवट आता थेट गोव्याच्या राजधानीत
शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात नागपूरपासूनच होणार आहे, यात कोणताही बदल नाही. मात्र, यापूर्वी हा महामार्ग गोवा-पत्रादेवी येथे संपणार होता, आता तो थेट पणजी पर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ही’ गावे होणार बाधित
सुधारित आराखड्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बाधित होणाऱ्या गावांची यादी खालीलप्रमाणे आहे:
हातकणंगले: जुने पारगाव, नवे पारगाव.
पन्हाळा: वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.
करवीर: केर्ली, केर्ले, पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कापार्डे, कुडीत्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, हसूर दुमाला, भाटणवाडी.
राधानगरी: राशिवडे बुद्रूक, चंदे, येळवडे, कोदवडे, वाघवडे, मोहडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.
कागल: बोरवडे, उंदरवाडी.
भुदरगड: नाथवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुली, मेघोली.
आजरा: हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोळ, मसोली, देऊळवाडी.
चंदगड: बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर.
नुकसान भरपाईकडे लक्ष
शासनाने आराखडा मंजूर केला असला, तरी शेतकरी आणि जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात किती मोबदला मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. “जोपर्यंत योग्य मोबदला आणि पर्यावरणाचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा पवित्रा कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना प्रशासनाचा कस लागणार आहे.











