परतूर |
परतूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडलेला इनोव्हा गाडीचा अपघात हा केवळ अपघात नसून, एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा धागा असू शकतो, अशी गंभीर चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे. रात्री उशिरा भरधाव वेगाने धावणाऱ्या इनोव्हा गाडीने डिव्हायडरला जोरदार धडक दिल्यानंतर समोर आलेल्या बाबींनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
अपघातग्रस्त गाडीची पाहणी करताना तिच्या मागील सीट काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. एवढेच नव्हे, तर गाडीत वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट आढळल्यामुळे हा प्रकार नियोजित आणि संशयास्पद असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या गाडीचा वापर गोवंश चोरीसाठी केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाईला विषारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून गाडीत टाकण्यात येत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसल्याचीही चर्चा आहे. मागील काही दिवसांत परतूर शहर व परिसरातून गाई चोरी होण्याच्या वाढत्या घटनांमुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.
अपघातानंतर गाडीतील चालक व इतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, या गंभीर प्रकरणात अद्याप ठोस कारवाई किंवा स्पष्ट तपासाची दिशा दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तब्बल दहा दिवस उलटूनही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही, ही बाब अधिक चिंताजनक ठरत आहे.
“या प्रकरणाचा सखोल तपास झाला, तर मोठे मासे गळाला लागू शकतात,” अशी चर्चा जोर धरत आहे. त्यामुळेच हा तपास कुठेतरी लालफितीत अडकला आहे का, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
परतूरकर नागरिकांनी आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शहरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला पूर्णविराम देण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी चालक व इतर संबंधितांविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी “तपास सुरू आहे,” असे सांगितले आहे.


