उत्रादा येथे जल जीवन योजनेअंतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला अखेर गती मिळाली आहे. या प्रकरणाची दखल विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारांनी सातत्याने घेतल्यामुळे प्रशासनाला जाग आली असून सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आज, 11 एप्रिल रोजी यशस्वी पूर्णविराम देण्यात आला. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यास मान्यता दिली आहे. या समितीद्वारे संबंधित कामांची तपासणी करून दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपोषणकर्त्यांनी या लढ्यात साथ दिल्याबद्दल सर्व पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा मुद्दा पुढे आला आणि प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली, असे उपोषणकर्त्यांनी नमूद केले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांकडूनही या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्यात येत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

