शहादा,दि.१२(प्रतिनिधी)
येणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी दुपारी पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्व धर्मीय बांधवांनी हा उत्सव समन्वयाने साजरा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, शांतता कमिटीचे सदस्य प्रा. एल.एस. सैय्यद, लोटनराव धोबी,ज्ञानेश्वर चौधरी, यादव कुवर, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, प्राचार्य मेहमूद खाटीक, वसीम तेली, आरिफ पिंजारी,मुनेशचंद्र जगदेव, अनिल भामरे, रमाशंकर माळी यांच्यासह पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर, रुपेश जाधव, हिरालाल रोकडे, ईश्वर पाटील, हर्षल सोनवणे, विष्णू जोंधळे, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत यांनी सांगितले,शहादा शहर नेहमीच शांतताप्रिय राहिले आहे. किरकोळ अपवाद वगळता सर्व सण येथे उत्साहात साजरे होतात. कायदा व सुव्यवस्था राखणे ही केवळ पोलिसांचीच नाही, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे.
माजी नगरसेवक आरिफ पिंजारी म्हणाले,मिरवणुकीत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होतात. अशा वेळी काही विघातक प्रवृत्ती गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात. पोलीस प्रशासनाने अशा लोकांची वेळीच माहिती काढून त्यांना कडक सूचना द्याव्यात.
पत्रकार विष्णू जोंधळे यांनी म्हटले,उत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहाद्यातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्व नेहमीच सकारात्मक विचार करते, त्यामुळे मिरवणुकीत सर्वजण एकत्र येतील.
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल कुवर यांनी सांगितले,मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्ते सुव्यवस्थित करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. तसेच पुतळा परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागणे कदापि शक्य नाही.
प्राचार्य मेहमूद खाटीक म्हणाले ,उत्सवाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि इतरांनाही घेऊ दिला पाहिजे. बंधुभाव हाच सणांचा मुख्य उद्देश असावा.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.मकरंद पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, म्हणाले की, महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे किंवा धर्माचे नसतात. त्यांच्या जयंतीला निमंत्रणाची वाट न पाहता सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, मात्र आपण संघटित होण्याऐवजी आपसात संघर्ष करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून नियमबाह्य वागणे चुकीचे आहे.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले की,काही मोजक्या विघातक लोकांमुळे संपूर्ण शहराला किंवा समाजाला वेठीस धरू दिले जाणार नाही. शांतता कमिटीने मांडलेल्या समस्या आणि मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल. सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव आदर्श ठरेल.
या बैठकीला शांतता कमिटीचे सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
