अहिल्यानगर : ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अजय राजेंद्र कचरे यांनी महसूल अधिकारी पदापर्यंत यशस्वी झेप घेतली आहे.
अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या बेताच्या कुटुंबात जन्मलेल्या अजय यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना केला. दोन वेळच्या जेवणासाठी आई-वडील व कुटुंबाची धडपड पाहून त्यांनी आपल्या परिस्थितीत बदल घडवण्याचा निश्चय केला.
उच्च शिक्षणासाठी ते आपल्या मावशीकडे अहिल्यानगर शहरात आले. मागील पाच वर्षांत त्यांनी नियमित अभ्यास करत अनेक अडचणींचा सामना केला. तीन ते चार वेळा थोड्या फरकाने अपयश आले तरी त्यांनी हार न मानता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर यश मिळवले.
त्यांच्या यशात आई-वडील, भाऊ-बहीण, मावशी व कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पत्रकार श्री. सुरेश भाऊ अंधारे यांनी सांगितले की, योग्य मार्गदर्शन व साथ मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या पदांपर्यंत पोहोचू शकतात.
अजय कचरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.
