कल्याण पूर्वेत चाळमाफियाबिल्डरची दादागिरी उघड! घराच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; पैसे मागितल्यावर हातपाय तोडण्याची धमकी
कल्याण:कल्याण पूर्वेत चाळमाफिया बिल्डरकडून ग्राहकांची उघडपणे फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीत घर देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून तब्बल पाच लाख रुपये उकळल्यानंतर ना घर दिले, ना पैसे परत केले; उलट पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिले आणि तिच्या पतीला थेट हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पालघर येथील रहिवासी कविता यादव यांना कल्याण पूर्वेतील गायत्री स्कूलजवळील आरबीएस इंटरप्राईजेसमार्फत आडीवली ढोकळी येथील सनराईस चाळीत एक रूम आणि गाळा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या व्यवहारासाठी संबंधितांनी चेक व रोख स्वरूपात तब्बल ५ लाख रुपये घेतले. मात्र अनेक महिने उलटूनही ना रूमचा ताबा देण्यात आला, ना पैशांचा हिशोब देण्यात आला.फसवणुकीचा संशय आल्याने कविता यादव आपल्या पतीसह बिल्डर कृष्णा यादव यांच्या घरी गेल्या असता, तेथे संतापजनक प्रकार घडला. कृष्णा यादव याने शिवीगाळ करत “पुन्हा आमच्या घरी आलात तर दोघांचे हातपाय तोडून टाकेन” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप आहे.या घटनेनंतर कविता यादव यांनी थेट मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संतोष यादव, बृजेश यादव, रंजीत यादव, सुनील यादव आणि कृष्णा यादव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणामुळे कल्याण परिसरात चाळ माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली असून, अशा फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)











