वर्धा | प्रतिनिधी |
पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोत्साहन अनुदान देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. सरपंच राजेश शिरगरे, उपसरपंच सचिन दहाट तसेच शैलेश तलवारे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
यामध्ये कल्याणी नरेश टेटू हिने ९५ टक्के गुण मिळवत नोबेल किड्स कॉन्व्हेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कल्याणी दिलीप वायरे हिने बारावीत ९३.६५ टक्के, संस्कार राहुल काळे याने दहावीत ८१ टक्के, रेहान खान शाहरुख खान पठाण याने बारावीत ८० टक्के, रितेश राजेश कावळे याने दहावीत ८१ टक्के आणि विवेक दिनेश वायरे याने दहावीत ८२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत, प्रोत्साहन अनुदानाचा धनादेश तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर्मी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलमताई बाबर, ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड तसेच पोलीस कर्मचारी रोशन करलुके उपस्थित होते.
पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटी या गुणांच्या बळावरच यशाचे उच्च शिखर गाठता येते, असे सांगितले. शिक्षणात सातत्य राखून एकाग्रचित्ताने वाटचाल करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी जबाबदाऱ्यांचे भान ठेवून प्रगती साधण्याचा संदेशही देण्यात आला.
सरपंच राजेश शिरगरे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात मोठे यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत हेरोडे यांनी केले. कार्यक्रमास गावातील महिला मंडळी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शहादत खान पठाण, ममता टेटू, सुरेखा वायरे, राहुल काळे, अनिल माने, रेखा कावळे, सविता ठेवले, जयश्री तलवारे, शारदा लवटे, कविता मात्रे, मिलिंद कावळे, शेख अन्वेष, वसंत मंडवे, महेंद्र म्हात्रे, रंजना काळपांडे, अनु दहाट, शकुंतला भगत आदींची उपस्थिती होती.







