निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुर्घटनेची भीती
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात नवीन वीज खांब उभारणे तसेच नवीन केबल टाकण्याचे काम एनसीसी कंपनीमार्फत सुरू असून, या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. परिसरातील अनेक नागरिकांकडून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वीज खांब आवश्यक त्या खोलीपर्यंत न गाडता केवळ वरवर बसवले जात आहेत. तसेच खांबांना आवश्यक असलेले मजबूत पॅकिंग आणि सिमेंट काँक्रिटचे फुटिंग योग्य पद्धतीने करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जोरदार पाऊस, वादळी वारे किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हे खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील नागरिकांनी संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत, काम करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे का, कामाची तपासणी कोण करत आहे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी येत आहेत का, अशी विचारणा केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, वीज खांब आणि केबलसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री काम न पाहता प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.
याकडे जळगाव महानगरपालिका तसेच महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने चौकशी करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंप्राळा परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.








