प्रतिनिधी :निकेश भिसे
जिंती (ता. फलटण)
रविवार दि. 12 एप्रिल 2026
श्री जितोबा जिंती ग्रामदैवत
नीरा नदीच्या काठी वसलेल्या ग्रामदैवत श्री जितोबा देवाच्या प्रसिद्ध बगाड यात्रेला रविवारी “जितोबाच्या नावानं चांगभलं,च्या जयघोषात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली.
सुमारे 350 वर्षाची परंपरा असलेली ही बगाड यात्रा फलटण तालुक्यात विशेष प्रसिद्ध असून भाविक भक्तांचे श्रद्धेचे केंद्र मानली जाते. राणनवरेवाडी, मांडकी, निमसाखर, निभोरे, शिंदेवाडी, लोणी तसेच कोल्हापूर, विदर्भ, आणि इत्यादी राज्यातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी जिंती मध्ये दाखल होतात
यात्रे दिवशी दुपारच्या सुमारास बगाडाचे मानकरी बगडाला तेल व कावाने सजवले जातात. भाविक आपले नवस बोलून नारळ अर्पण करतात तसेच बगाडाला पैसे बांधण्याची परंपरा आहे. हराळी वैष्णव समाजातील या बगडाचे प्रमुख मान आहे. ग्रामस्थ व कमिटीच्या वतीने मानकऱ्यांना पारंपरिक पोशाख देण्यात येतो.
यानंतर गुलाल खोबऱ्याची उधळले जाते आणि “जितोबाच्या नावानं चांगभलं बोला चांगभले च्या गजरात मानकरी बगाडावर चढतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उत्सव पूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडतो. काही ठिकाणी मानकऱ्यांच्या पायावर पाणी ओतण्याची प्रथा देखील पार पाडली जाते.
यात्रेतील सर्वात आकर्षक ठरलेला ‘भाकणूक’ कार्यक्रम
भाविकभक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. या कार्यक्रमात वर्षभरातील पाऊस, पाणी, शेतीची स्थिती, तसेच रोगराईबाबत भाकीत करण्यात येते . या भाकणुकीला ऐकण्यासाठी दूरवरून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे पालखी छबिना निघाली जाते
जितोबा देवस्थान कमिटी यांच्यावतीने भाविकभक्तांसाठी पिण्याचे पाणी, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
तसेच यात्रेनिमित्त परिसरात खेळण्यांची दुकाने, पाळणे,झोपाळे आणि विविध मिठाईची दुकाने उभारण्यात आली होती. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.
यात्रास्थळी वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत होते. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी दक्षता घेत विशेषत,बगाड सोहळ्यावेळी व प्रमुख कार्यक्रमांच्या वेळी पोलीस बंदोबस्तामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
ही भव्य दिव्य सुप्रसिद्ध बगाड यात्रा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकात्मतेचे जिवंत प्रतीक ठरली,विविध भागांतून आलेल्या भाविक एकत्र येत श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवला. या यात्रेमुळे समाजातील बंधुभाव आणि पारंपरिक वारशाची जपणूक अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.











