जत / प्रतिनिधी : कुंभारी (ता. जत) येथे पाझर तलाव अचानक फुटल्याची घटना घडली असून, यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार विक्रम दादा सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
तलाव फुटल्यामुळे परिसरातील ऊस, मका तसेच बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे ६० ते ७० हेक्टर शेती बाधित झाली आहे. याशिवाय अनेक विहिरी गाळाने भरल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.
यावेळी सावंत यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची ठाम मागणी केली. ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत जबाबदारांवर कारवाई करण्याची तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
या पाहणीवेळी श्री. नानासाहेब सूर्यवंशी, श्री. प्रभाकर जाधव, सरपंच श्री. कृष्णा जाधव, उपसरपंच श्री. अजित सूर्यवंशी, श्री. काकासो शिंदे, श्री. महादेव सूर्यवंशी, श्री. भानुदास जाधव, श्री. सोपान जाधव यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











