आंदोलनाची ठिणगी पडली : नेवरी ग्रामस्थ आक्रमक…..
कडेगाव
‘शक्तीपीठ’ महामार्गाचे नवे रेखांकन झाले असून हा मार्ग आता कडेगाव तालुक्यातील नेवरी, वडियेरायबाग, शेळकबाव, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे असा पुढे पलूस वाळवा तालुक्यात कृष्णा नदीकाठच्या गावातून जात असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता कडेगाव तालुक्यातील हा सर्व भाग येरळा नदीकाठच्या सुपीक व बागायती शेतातून जात आहे. येरळा नदी, ताकारी, टेंभू व आरफळ योजनांच्या पाण्यामुळे इथली शेती बहरली आहे. हजारो युवक शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. आता कुठे शेतीला बरे दिवस येऊ लागले आहेत असे असताना आता हे शक्तीपीठ महामार्गाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसू पाहत असल्याने इथला शेतकरी चांगलाच धास्तवला आहे. मुळात हे रेखांकन कोणी व कसे केले हे समजत नाही. कारण हा शेतकरी अतिशय कमी शेती असणारा शेतकरी आहे, सरासरी दोन-पाच एकर किंवा त्याहीपेक्षा कमी शेती असणारा शेतकरी आहे.
या रेखांकनात अनेकजण भूमिहीन होण्याची भीती आहे. हातातील शेती गेल्यावर तरुणांनी काय करायचे आणि ही कुटुंब कशी जगतील असा प्रश्न आहे. येरळा काठचा हा भाग अतिशय कष्टाळू आहे. इथली द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, आले, हळद, केळी, भाजीपाला, फुले ही सातासमुद्रापार जात आहे. ऊस शेती अतिशय दर्जेदार केली जाते, पण या महामार्गाने सगळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. केवळ शेती च नव्हे तर शेतीपूरक अनेक व्यवसाय व उद्योगांवर यामुळे कुऱ्हाड कोसळणार आहे. तरुण बेरोजगार होणार आहेत तर अनेक कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. याविरोधात आवाज उठविण्यासाठी नेवरी ग्रामस्थांनी वज्र्यमूठ बांधली असून ग्रामस्थांनी कडेगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत हा महामार्ग या परिसरातून रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी जमीन देण्यास सर्व शेतकऱ्यांनी एकमताने नकार देत शासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गासाठी स्थानिक पातळीवर कोणतीही मागणी नाही. तसेच, वाहतुकीसाठी इतर सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध असताना, पुन्हा एकदा या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवरच घाला घालू नये,
शासनाने या महामार्गाबाबत नेवरी गावात कोणतीही पुढील कार्यवाही करू नये आणि हा महामार्ग आमच्या हद्दीतून पूर्णतः रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा प्रकल्प मागे न घेतल्यास, प्रशासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
फोटो :
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार अजित शेलार यांना देताना नेवरी ग्रामस्थ….










