सेलू तालुका / प्रतिनिधी :
तालुक्यातील धनेगाव येथे श्री मल्लिका देवी संस्थानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय चैत्र वद्य अष्टमी उत्सव दिनांक १० व ११ एप्रिल २०२६ रोजी धार्मिक आणि सामाजिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोळासोपचार पूजा, रुद्राभिषेक व आरती पार पडली. यावेळी धनेगाव उच्च प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमात संस्थानचे सचिव डॉ. दत्तात्रेय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आहार-विहार, अभ्यास पद्धती व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.
कृषिभूषण अजय जाधव यांनी नैसर्गिक व विषमुक्त शेतीबाबत मार्गदर्शन केले, तर ऋग्वेद चौधरी यांनी आधुनिक तंत्रज्ञान, यूट्यूब व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग शिक्षणात कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नगर भजन, महाप्रसाद व महापंगत आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ३००० पेक्षा अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. संस्थानचे अध्यक्ष अमित चौधरी तसेच इतर मान्यवरांनी नैसर्गिक शेती, देशी गोवंश संवर्धन आणि पशुपालनासंदर्भात मार्गदर्शन करत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभू कटारे, दत्ता कटारे, अर्जुन कटारे, थोरे व कटारे परिवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले.







