नांदेड (प्रतिनिधी) : किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
जयंतीचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पार पडला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली. आमदार भीमराव केराम यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
यावेळी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. ॲड. दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडू तर गुरुस्वामी पवार यांनी शीतपेयांचे वाटप केले. काही कार्यकर्त्यांनी मठ्ठ्याचेही वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
बसस्थानकात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते, तर जेतवन बुद्ध विहारात नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे निखिल सर्पे, आकाश सर्पे, अनिकेत भरणे, सिद्धार्थ भरणे, ऑलफ्रेंड ठमके, संघर्ष घुले, अनिल कांबळे आदींनी पुढाकार घेतला.










