अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद तीर्थ पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य अधिकारी जयंत हजारे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या नाल्यातील दूषित पाण्यामुळे समर्थ गृह सोसायटी, डिफेन्स कॉलनी, मोहन पुरम तसेच स्वामी देवप्रकाश संकुल परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून प्रदूषणाचे मूळ कारण शोधावे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नाल्याची नियमित स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावरही भर देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने त्वरित आणि ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.










