विरार (प्रतिनिधी)
शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नारंगी पुलाची मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी महापौर अजीव पाटील आणि सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता हा चार लेन पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्यावर प्रशासनाचा भर आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांच्या पत्रानुसार विरार–वैतरणा सेक्शनमधील हा पूल पूर्ण झाला असून 19 एप्रिल 2026 रोजी उद्घाटनाची संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी जुना रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
पाहणीदरम्यान महापौर अजीव पाटील यांनी पुलाच्या दर्जा व सुरक्षिततेचा आढावा घेतला. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीशकुमार सूर्यवंशी यांनी तांत्रिक माहिती सादर केली. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी कंत्राटदारांना दिले.
दरम्यान, फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) करण्यात यावा, अशी स्थानिक नागरिकांची आग्रही मागणीही पुढे आली आहे. महापौरांनी याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
या पाहणीवेळी युवा समाजसेवक सागर पाटील, प्रतीक ठाकूर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारंगी पूल सुरू झाल्यास विरार शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









