कल्याण–मुरबाड महामार्गावर रायता पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवारीही शेअर टॅक्सी आणि इको व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून प्रवास सुरू असल्याचे दिसून आले.
इको व्हॅनमध्ये सहा प्रवाशांची परवानगी असतानाही बिर्लागेट थांब्यावर नियम धाब्यावर बसवून अधिक प्रवासी बसवले जात होते. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महामार्गावर म्हारळ नाका परिसरात वाहतूक पोलिसांचे पथक नियमित तैनात असतानाही अवैध वाहतूक रोखली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “अशा बेकायदा वाहतुकीवर कारवाई का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही चालकांवर गुन्हे दाखल केले असून, अपघातास नेमके कोण जबाबदार याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी तपास करत आहे.
दरम्यान, कल्याण–मुरबाड महामार्गावरील गोवेली ढाब्याजवळचे वळण, रेवती–बापसई आणि मामनोली गावाजवळील जंगलातील वळण ही तीन ठिकाणे धोकादायक ठरत असून, स्थानिक ग्रामस्थांनी येथे सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
अपघातानंतरही काही रिक्षाचालक मुरबाडसाठी प्रवाशांकडून १०० ते १५० रुपये आकारत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तसेच अपघातग्रस्त भागात डिव्हायडरवर पांढरे पट्टे नसल्याने दृश्यमानता कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या सर्व घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









