रिसोड (प्रतिनिधी) : रिसोड शहरात वीजपुरवठ्याच्या सतत होणाऱ्या खंडित समस्येमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दिवसाला तब्बल ५ ते ६ वेळा वीज ये-जा होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात वीजपुरवठ्याची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे आणि व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याने अनेक नागरिकांचे फॅन, टीव्ही, कुलर यांसारखी विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे नागरिकांना हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
यूनिट कमी, बिल जास्त – नागरिकांचा आरोप
वीजपुरवठा खंडित असतानाही वीजबिल मात्र जास्त येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “स्मार्ट मीटर बसवले, पण सुविधा मात्र ‘अनस्मार्ट’ झाल्या,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अधिकारी केवळ स्मार्ट मीटर बसवण्यावर भर देत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याची टीका नागरिक करत आहेत.
दरम्यान, या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधीही शांत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ आश्वासनांपुरतेच काम मर्यादित राहिले आहे, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
“वीज ही आमची मूलभूत गरज आहे, ती सुरळीत मिळालीच पाहिजे,” असा सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.







