- प्रा. डॉ. विश्वंभर गायकवाड
उदगीर (प्रतिनिधी “)महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ज्ञानाला संविधानाच्या माध्यमातून येथील बहुजनांना न्याय मिळवून दिला. या महामानवांनी पाहिलेले समतावादी प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तरुण पिढीची आहे. त्यासाठी आजच्या विद्यार्थांनी महापुरुषाचे मूळ साहित्य वाचले पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. विश्वंभर गायकवाड यांनी केले. ते वाढवणा बु. येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताहाच्या प्रसंगी ते बोलत होते.*
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य विरभद्र बिरादार होते तर प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर येथील प्रा. विश्वंभर गायकवाड हे उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक मनोज माने, पर्यवेक्षक जागीरदार एन. एम. प्रा. रमेश केंद्रे, प्रा. उमाकांत कांबळे, मु. अ. सुनीता फड, प्रविण भिंगोले आदीची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. गायकवाड यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शिक्षण आणि आर्थिक विचारांची मांडणी केली तसेच महात्मा फुले मांडलेला सत्यशोधक विचार हाच खऱ्या अर्थाने समतावादी समाजाचा पाया आहे. या महामानवांचा विचार आजच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्रवीण भिंगोले यांनी सप्ताहाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. प्रा. शफीउल्ला खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विरभद्र बिरादार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत या महापुरुषांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जागीरदार एन. एम. यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रमेश केंद्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अभिजित डांगे, प्रा. रविकिरण कांबळे, अमित तिगोट, नामवाड व किशोर तोळसरवाड यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











