आजरा (प्रतिनिधी) :
Kolhapur Zilla Parishad च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जास्मिन यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ व स्वागतपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि विविध समिती सभापतींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय राजवट संपून जिल्हा परिषदेत लोकनियुक्त पदाधिकारी विराजमान झाल्याबद्दल सरपंच परिषदेने समाधान व्यक्त केले. यावेळी अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी कृष्णात पाटील, तसेच विविध समित्यांच्या सभापतींचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांनी ग्रामीण भागातील विकासाला आता गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेले ग्रामपंचायत स्तरावरील प्रश्न आता मार्गी लागतील,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान सरपंच परिषदेतर्फे जिल्ह्यातील महत्त्वाच्या समस्यांकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये SVAMITVA Scheme अंतर्गत ड्रोन सर्वेक्षणातील त्रुटी, औद्योगिक सांडपाण्यामुळे निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे या मुद्द्यांचा समावेश होता.
प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस यांनी सरपंचांच्या विविध मागण्यांचा ठराव जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्याची मागणी केली.
यावेळी जिल्ह्यातील सरपंचांकडून वणवा निर्मूलन, वृक्षलागवड, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, सेंद्रिय शेती व प्लास्टिक निर्मूलन यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई पाटील, जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष नेताजी पाटील, तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










