अकोला : उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात यंदा उष्णतेचा पारा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त होत असताना, सिमेंट रस्त्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे उष्णतेत भर पडत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
‘प्रगती’ आणि ‘आधुनिक पायाभूत सुविधा’ या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते बांधले जात असून, यामुळे नैसर्गिक वातावरणाचा समतोल बिघडत असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः कायम थंड वातावरण असलेल्या भागांसाठी योग्य असलेले सिमेंट रस्ते उष्ण प्रदेशात वापरणे हा चुकीचा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नागरिकांच्या मते, या सिमेंट रस्त्यांमुळे उष्णता अधिक प्रमाणात साठून राहते, ज्यामुळे परिसरातील तापमान वाढते आणि उष्माघाताचा धोका वाढतो. भविष्यात याचा परिणाम विशेषतः वयोवृद्ध नागरिकांवर गंभीर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. “पर्यावरणाला बाधा पोहोचवून उष्णतेला आमंत्रण देणाऱ्या धोरणांवर अद्याप कार्यवाही का होत नाही?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
तसेच, कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करणाऱ्या संबंधित व्यवस्थापनाने, जर पर्यावरणीय परिणामांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई देण्याची मागणीही जोर धरत आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व मा. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
— पंजाबराव खाडे, जि. प्रतिनिधी
“सारथी महाराष्ट्राचा”








