भडगाव प्रतिनिधी :
कजगाव शिवारात सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कजगाव येथील शेतकरी रवींद्र राजाराम साठे आणि गणेश साठे यांच्या जवळपास पाच एकर क्षेत्रातील उभा मका पूर्णपणे जळून खाक झाला. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केल्यामुळे पिकासह ठिबक सिंचन संचही पूर्णतः नष्ट झाला.
या आगीत शेजारील शेतकरी प्रवीण पाटील यांचे दोन बैल, तसेच अनिल चौधरी यांच्या शेतातील दोन बैल व एक गाय गंभीर जखमी झाली. याशिवाय मंगलबाई भिमसिंग पाटील यांच्या शेतातील अंदाजे १० ते १५ हजार रुपयांचा मका जळून खाक झाला.

प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी धाव घेत विहिरीतील पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.











