परळी वैजनाथ प्रतिनिधी :
DYFI युवक संघटनेच्या वतीने टोकवाडी, नागापूर, बोधेगाव, मोहा व शिरसाळा या मार्गांच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.
नागापूर ते बोधेगाव आणि मोहा ते शिरसाळा या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न असून शासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यांचे काम सुरू करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
संघटनेने यापूर्वीही या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
कडक उन्हात आणि वाढत्या तापमानातही आंदोलन सुरू असून प्रशासनाकडून अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
दरम्यान, संघटनेच्या वतीने विविध गावांमध्ये जनजागृती करून नागरिकांचा पाठिंबा मिळवला जात आहे. या आंदोलनाला परिसरातील गावांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने ते आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गर्भवती महिला, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ रस्त्यांचे काम सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती भारतीय दलित पॅंथर चे परळी तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.











