अक्राणी | प्रतिनिधी
शहादा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करावा, अशी मागणी बिरसा फायटर्स, नंदुरबार संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना जळालेला भात व पाणीदार भाजी दिली जात असल्याने संतप्त विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. निकृष्ट अन्नामुळे काही मुलींची तब्येत बिघडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ठेकेदारावर राजकीय पाठबळ असल्यामुळे कारवाई होत नसल्याचीही चर्चा रंगली असून यामुळे विद्यार्थिनींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.


दरम्यान, सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थिनींना तात्पुरते आश्वासन दिले आहे. मात्र, ठोस कारवाई न झाल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून विद्यार्थिनींच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.










