श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, महावीर पटवा आणि बाळासाहेब महाडिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी मान्यवरांचे स्वागत करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात बबनराव पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा, संघर्ष आणि परिश्रम यांच्या जोरावरच मोठे यश मिळते,” असे सांगितले.
बाबासाहेब भोस यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या प्रगती मुसळे, प्रियंका दरवडे, यशोदा म्हस्के, निशांत एकमले, अश्विनी हिरडे, मनीषा कापसे, सावरी खडके, स्वप्निल चौधरी, क्रांती रसाळ, फुलाबाई पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अरबाज शेख (राज्य राखीव पोलीस बल), सौरव खळे (पॅरा कमांडो), प्रदीप गोडसे, नूतन वागस्कर, राहुल दरेकर (महसूल सहाय्यक), कु. संगीता आढाव (वसतिगृह अधीक्षक) आणि ऋषिकेश नांगरे (इंडियन आर्मी) यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी पॅरा कमांडो ऋषिकेश नांगरे यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. राजाराम कानडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले, तर कर्मवीर भाऊराव पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन प्रा. अनिल ढवळे यांनी आभार मानले.











