श्रीगोंदा (प्रतिनिधी)
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना कष्ट, शिक्षण आणि चिकाटीच्या बळावर जीवन यशस्वी करण्याचा संदेश दिला.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही आपल्या भाषणात फुले-आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजात झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र मौखिक साधन व संकलन अभियानाचे प्रमुख कृष्णा घोलप होते. त्यांनी “गुलामगिरी ते संविधान” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत थोर पुरुषांना जातीत न विभागता त्यांच्या विचारांचे जतन करण्याचे आवाहन केले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून संविधानाच्या मूल्यांवर आधारित संस्कृती निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. थोर पुरुषांच्या विचारांचे वाचन व आचरण हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बाळासाहेब महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम कानडे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा, सचिन महाडिक, योगेश भोसले, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, प्रा. रत्नाकर झिटे, प्रा. उषा बोरुडे, रासेयो प्रमुख प्रा. भाऊ बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ. राहुल गायकवाड, प्रा. कल्पना बागुल, प्रा. रमेश थोरात, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. हरिभाऊ वाघीरे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल ढवळे यांनी मानले.











