माहूर (प्रतिनिधी) : माहूर नगर पंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल २ कोटी रुपयांचा घरकुल निधी अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, दोषींवर फौजदारी कारवाईसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सन २०१७ ते २०२१ या कालावधीत १३२ लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेला निधी नियमांना बगल देऊन एका खाजगी संस्थेकडे वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘मे. नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था, अकोला’ या संस्थेला काम देताना आवश्यक प्रशासकीय परवानग्या न घेता आणि संशयास्पद पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
भाजपच्या निवेदनानुसार, तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगर अभियंता यांच्या संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तसेच लाभार्थ्यांना मिळणारे घरकुल अनुदान थेट न देता इतर कारणांसाठी वळवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर परिषद प्रशासन संचालनालयाने २२ जुलै २०२५ रोजी या प्रकरणाची दखल घेत रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे केली आहे. दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष सागर महामुने, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










