धाराशिव (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील नायगाव येथे गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेर खुला करण्यात आला आहे. गट क्रमांक ३९२, ३९३, ४००, ४०१, ४०२, ४०३ व ४०६ मधील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर हा रस्ता सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंडळ अधिकारी श्रीमती वर्षाताई ढेकरे आणि ग्राम महसूल अधिकारी संजयकुमार माळी यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही पार पडली. भर उन्हात शेतकऱ्यांशी संवाद साधत कोणताही वाद निर्माण न होता सुमारे ७०० ते ८०० मीटर लांबीचा शेतरस्ता खुला करण्यात आला.
अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता खुला झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीकामासाठी विना अडथळा ये-जा करता येणार असून मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी अधिकाऱ्यांनी शेतरस्त्याचे महत्त्व समजावून सांगत शांतता व समन्वयाने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. संबंधित गटातील शेतकरी व्यंकट यशवंता माळी, बळवंत माळी, विजयकुमार चांडक, शिवाजी होदाडे, सोमनाथ घोडके, महालदार घोडके, अनिल नाडे, वैजनाथ घोडके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
रस्ता खुला झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.








