धाराशिव (प्रतिनिधी) : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, १५ एप्रिल रोजी तहसीलदार निलेश काकडे हे शासकीय कामकाज आटोपून बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) आणि अन्य एका व्यक्तीने त्यांचे वाहन अडवले. यावेळी संबंधितांनी शिवीगाळ करत वाहनावर हातोडा मारण्याचा प्रयत्न केला तसेच तहसीलदारांच्या दिशेने धाव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, चांदणी नदी परिसरातही वाहन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. “निवेदनावर कारवाई का झाली नाही?” असा जाब विचारत धमकी दिल्याचेही निवेदनात नमूद आहे.
संघटनेने या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप देत तालुका दंडाधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. राज्यात यापूर्वीही अशा घटना घडल्याने प्रत्येक तहसीलदार व नायब तहसीलदारांना कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा अशा घटनांना आळा बसणार नाही, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
या निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








