भारम/अंदरसूल (प्रतिनिधी) :
भारम येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात हवामान अंदाजांबाबत मार्गदर्शन करताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचे भाकीत व्यक्त केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील काळात प्रत्येकी दोन वर्षाआड पावसाचे चक्राकार स्वरूप दिसणार असून हीच परिस्थिती २०५० पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या काळात दोन वर्षे सरासरीपेक्षा अधिक पाऊस, तर एका वर्षी सरासरी पाऊस असे हवामानाचे स्वरूप राहू शकते.
यावेळी त्यांनी सध्याच्या माध्यमांतील दुष्काळाच्या चर्चांवर भाष्य करताना सांगितले की, मागील वर्षी परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता, त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र यावर्षी पिकांसाठी अनुकूल असा सरासरी पाऊस पडण्याची शक्यता असून पिकांची स्थिती समाधानकारक राहील, असे त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात उपस्थित डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेवर भर देत जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच छोटे-छोटे खड्डे करून भूजल पातळी वाढवता येते, असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत परिसराचा विकास करण्यासाठी योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास माजी पदाधिकारी महेंद्र शेठ काले, मच्छिंद्र थोरात, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी संघटना नेते, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.








