सेलू (जि. वर्धा), दि. २२ एप्रिल :
सेलू तालुक्यातील सालई (पेवठ) शिवारात पहाटेच्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात किसना तिळमगाम हे शेतकरी गंभीर जखमी झाले. आज सकाळी सुमारे ६ वाजता शेताकडे गेले असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. गावकऱ्यांचा जमाव येताना पाहून अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी किसना तिळमगाम यांना ग्रामस्थांच्या मदतीने सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे सालई (पेवठ) परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात वावरणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, जखमी शेतकऱ्याला वनविभागाकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, तसेच वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर शेतात काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाने परिसरावर लक्ष ठेवले असले, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.











