हदगाव (प्रतिनिधी) :
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हा सोहळा दि. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पार पडणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यासाठी हदगाव येथील डोंगरगाव रोडवरील रामलीला मैदानावर भव्य मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल १०० गरजू वधू-वरांचा विवाह विनामूल्य लावून देण्यात येणार असून, विवाहासाठी आवश्यक सर्व सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आर्थिक अडचणीमुळे विवाह लांबणीवर टाकणाऱ्या कुटुंबांसाठी हा सोहळा दिलासादायक ठरणार असून, समाजात एकोपा व समतेचा संदेश देणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, ऐनवेळी लग्न ठरलेल्या इच्छुक जोडप्यांनाही या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ विवाह सोहळा नसून समाजातील गरजू घटकांना आधार देणारा एक सामाजिक प्रयत्न आहे. त्यामुळे पात्र जोडप्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, हदगाव येथे होणारा हा सामूहिक विवाह सोहळा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










