पुरंदर (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मौजे भिवरी येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “एकच साहेब बाबासाहेब” आणि “जयभीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दि. १४ एप्रिल रोजी ग्रामदैवताच्या यात्रेमुळे सामाजिक सलोखा जपत जयंती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर अखिल पंचशील तरुण मंडळाच्या वतीने सासवड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते भिवरी येथील बौद्ध विहार असा पायी ज्योत आणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शनिवार दि. १८ एप्रिल रोजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात सरपंच मोनाली कटके यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी त्रिशरण पंचशील व धम्म वंदना घेण्यात आली. राहुल कटके, प्रकाश कटके, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमांची आकर्षक सजावट करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि भीमगीतांच्या तालावर जयघोष करत वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अन्नदान करून जयंतीची सांगता करण्यात आली.
या जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल पंचशील मित्र मंडळाचे अनिल गायकवाड, अध्यक्ष श्रीधर गायकवाड, कैलास गायकवाड, विठ्ठल गायकवाड, केरबा शेलार, मेघराज शेलार तसेच इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.











