आजरा (प्रतिनिधी):
“अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥” या मंत्रघोषात ब्राह्मण सभा आजरा यांच्या वतीने भगवान परशुराम जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी चैतन्य हॉल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ. आनंद महाराज गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या षोडशोपचार पूजनाने झाली. यंदा अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच शिवजयंतीचे औचित्य असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले, तसेच समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले.
संस्कारांची जपणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी सामूहिक हनुमान चालीसा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. आपल्या आशिर्वचनात डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी “देव ओळखण्याची पात्रता ही धर्म संस्कारांतूनच निर्माण होते,” असे सांगत धर्माचरण व आदर्श जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी समाजातील वाढती जागरूकता पाहून समाधान व्यक्त केले व सर्वांना आशिर्वाद दिला.
कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच ब्राह्मण सभेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. माजी अध्यक्ष जयवंत केळकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर आपटे यांनी केले. शेवटी महिलांच्या हळदीकुंकू समारंभानंतर सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









