जालना (प्रतिनिधी) – शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कायद्याचे भक्कम ज्ञान मिळावे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहावी, या उद्देशाने जालना येथे विशेष एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जालना महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या शिबिरात ‘संवाद मेळावा’ आणि ‘प्रशिक्षण’ या दुहेरी संकल्पनेतून नगरसेवकांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण, तसेच गुन्हेगारीविरोधात तत्पर भूमिका घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती या माध्यमातून देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटन मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक बन्सल होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, प्रभारी उपअधीक्षक रायततुवार, अशोक पांगारकर, कमलेश खरे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध कायदे, नागरिकांशी संवाद साधण्याची पद्धत, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी समन्वय कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे नगरसेवकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात उपयोगी पडणारे व्यावहारिक ज्ञान मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
दरम्यान, या प्रशिक्षण शिबिराबाबत संध्याताई देठे यांनी समाधान व्यक्त करत, “अशा उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधींना कायद्याचे योग्य भान मिळून नागरिकांची सेवा अधिक प्रभावीपणे करता येईल,” असे सांगितले.
या उपक्रमामुळे जालना शहरात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय अधिक बळकट होऊन गुन्हेगारीविरोधात ठोस पावले उचलण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










