आजरा (प्रतिनिधी) – शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था गंभीर बनली असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजरा नगरपंचायत यांना निवेदन सादर करण्यात आले. अन्याय निवारण समितीच्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
शहरातील अनेक अंगणवाड्यांच्या इमारती जर्जर अवस्थेत असून, पावसाळ्यात छत गळती, मोडकळीस आलेली शौचालये आणि तुटलेले दरवाजे-खिडक्या यामुळे मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनात छप्परांची तातडीने दुरुस्ती करणे, स्वच्छतागृहांची उभारणी व दुरुस्ती, खिडक्या-दारांची दुरुस्ती तसेच पूर्णपणे जीर्ण झालेल्या अंगणवाड्यांसाठी नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना डॉ. स्मिता कुंभार यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळलेल्या समस्यांचा आढावा मांडला. यावेळी उषा गोपाळ पाटील, नसिम जमसिद जमादार, मंगल सुरेश यादव, छाया शंकर तिप्पट, छाया गुंडू कुंभार, हमाली राकेश पाटील, माधुरी अतुल कुंभार व माधुरी गवंडळकर या महिला उपस्थित होत्या.
लहान मुलांच्या आरोग्य व शिक्षणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या निवेदनामुळे अंगणवाडी दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता नगरपंचायतीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











