परभणी (प्रतिनिधी):
मानवत येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, शाखा क्रमांक १ येथे दि. २३ एप्रिल रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंशासन दिन’ तसेच मुख्याध्यापिका जरीना शेख यांच्या निरोप समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मोहम्मद बदरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अध्यक्षस्थानी पाथरी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुजीब अन्सारी होते, तर नगरसेवक मोहम्मद बिलाल बागवान, डॉ. आहद बेलदार, डॉ. जुबेर खान आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भूमिका स्वीकारत शाळेचे दैनंदिन कामकाज जबाबदारीने सांभाळले. विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता व जबाबदारीची जाणीव विकसित होत असल्याचे दिसून आले.
यानंतर मुख्याध्यापिका जरीना शेख यांच्या निरोप समारंभात त्यांच्या सेवाकाळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही भावनिक वातावरणात आपल्या भावना व्यक्त करत त्यांना निरोप दिला.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत परिश्रम, शिस्त आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुजीब अन्सारी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऐहतेसार अन्सारी, रिजवानुद्दीन, बद्रुद्दीन, निखत मॅडम, अन्सारी इशरत फातेमा यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रिजवानुद्दीन यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऐहतेसार अन्सारी यांनी मानले.
नगरसेवक मोहम्मद बिलाल बागवान यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,” असे मत व्यक्त केले.










