महानगरपालिकेकडून शहरवासियांना सहकार्याचे आवाहन
परभणी (प्रतिनिधी):
आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला असून, ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या अधिकारी कोमल सावरे यांनी केले आहे.
कोमल सावरे यांनी सांगितले की, जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून तिच्या माध्यमातून देशातील लोकसंख्या, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत अचूक माहिती संकलित केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना आखते आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.
त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, जनगणना कर्मचारी माहिती संकलनासाठी घरी आल्यास त्यांना अचूक, पूर्ण आणि सत्य माहिती द्यावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे टाळावे, जेणेकरून जनगणनेचे आकडे विश्वासार्ह राहतील.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल व तिचा वापर केवळ शासकीय कामासाठीच केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात असून, सर्व आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.










