एरंडोल (प्रतिनिधी – तुषार शिंपी) : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे उष्माघाताचा संशय असलेल्या घटनेत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सखुबाई अशोक देशमुख असे मृत महिलेचे नाव असून त्या शेतमजूर म्हणून काम करत होत्या. एरंडोल तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिलाच बळी असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख मढी परिसरातील रहिवासी सखुबाई देशमुख या शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) इतर महिला मजुरांसोबत महेंद्र महाजन यांच्या शेतात निंदणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास काम करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ सावलीत नेऊन प्राथमिक मदत देण्यात आली व पुढे डॉ. सुयश पाटील यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपासून एरंडोल परिसरातील तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा दावा केला असला तरी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सखुबाई देशमुख यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून शेतमजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता. त्यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या उष्णतेत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









