कांदिवली (प्रतिनिधी) : कांदिवली पश्चिम येथील गोरसवाडी परिसरात बाप्पा सिताराम सेवा मंडळातर्फे १४वा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबातील नववधू-वरांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.
शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता मिलाप सिनेमा मागील गोरसवाडी परिसरात १५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बाप्पा सिताराम यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी “बाप्पा सिताराम”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
या सोहळ्यास खासदार गोपाळ शेट्टी, भाजप उत्तर मुंबई अध्यक्ष बाळा तावडे, नगरसेवक गणेश खणकर, माजी नगरसेवक कमलेश यादव, हिमांशू पारेख, नगरसेविका दक्षता कवठणकर, लिना देहेरकर, विजयभाई गिरकर, प्रतिभा गिरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक भाजप महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी कामकाज उत्तम प्रकारे पार पाडले.
सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नववधू-वरांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नातेवाईकांनी आयोजकांचे आभार मानले. सामाजिक एकोप्याचा आणि सहकार्याचा संदेश देणारा हा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.








