नितेश गट्टीवार
गडचिरोली दि.२६ एप्रिल:
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेअंतर्गत मौजा चोप येथे पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा म्हणून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होणार असून ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. सदर रस्त्याचे काम घनश्याम भर्रे यांच्या शेतापासून केशव मासुरकर यांच्या शेतापर्यंत करण्यात येणार असून अंदाजे ८.५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
या कामाचे भूमिपूजन रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते सुविधा सक्षम करणे हे आपले प्राधान्य असून प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रधान, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सरदार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, विलास बन्सोड, कमलेश बारस्कर, शैलेश बगमारे, नायब तहसीलदार कुंभरे, नायब तहसीलदार तुपटे, तलाठी कांबळे मॅडम, मंडळ अधिकारी राऊत, ग्रामसेवक मेघा राऊत मॅडम, काँग्रेसचे रवींद्र गोडेफोडे, गरीबदास बाटबर्वे, घनश्याम भर्रे, केशव मासुरकर, प्रशांत कुथे, धर्मेंद्र लाडे, महेश मुंडले, प्रशान कुते, विलास तुपटे, मदन बनपूरकर, कोतवाल अजय पर्वते आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भूमिपूजनामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.










