अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई ते कळंब तालुक्यातील सुमारे २० गावांमधून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लोकजागृती करण्यासाठी लोकसंवाद पदयात्रेला सोमवार, २७ एप्रिलपासून अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथून प्रारंभ झाला आहे. या पदयात्रेचा समारोप १ मे २०२६ रोजी कळंब येथे होणार असल्याची माहिती प्रमुख संयोजक डॉ. सोमनाथ रोडे यांनी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष, सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांची जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
ही पदयात्रा पूर्णपणे जनाधारावर आधारित असून, जनतेच्या स्वेच्छेने मिळणाऱ्या योगदानातून ती पार पडणार आहे. दररोज ३ ते ४ गावांमध्ये सेंद्रीय शेती, गोबर गॅस, गांडूळ खत निर्मिती, पारंपरिक बियाणांचे जतन, पर्यावरण संतुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामसफाई, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, आरोग्य शिक्षण, सौरऊर्जा, प्लास्टिक निर्मूलन अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
पदयात्रेदरम्यान विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना मिळणार आहे. तसेच ग्रामविकासाशी संबंधित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, आनंदवन, कडवंची, पाटोदा आणि लेखा-मेंढा या गावांच्या धर्तीवर स्थानिक विकास घडवून आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पक्षनिरपेक्ष विचारसरणीवर आधारित आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारी ही पदयात्रा असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. या लोकसंवाद पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.









